इतिहास
या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरु होतो.
मंदिराची रचना
श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे.
येथे ह.भ.प. ऎश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे.
जाण्याचा मार्ग
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे.
श्रीक्षेत्र भगवानगड हे टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या खरवंडी गावापासून सुमारे ४-५ कि.मी. अंतरावर आहे.
भगवानगडाच्या सर्वात जवळचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक खरवंडी येथे आहे.
मुंबई-पुणे-अहमदनगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगडावर पोहोचता येते. राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमवर पाथर्डीपासून साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर भगवानगड वसले आहे.
औरंगाबाद-पैठणवरून शेवगावमार्गे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १४८ वर पैठणपासून ७० कि.मी. अंतरावर भगवानगड आहे.
बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे ७० कि.मी. अंतर पार करुन भगवानगडावर जाता येते.
भगवानगडाच्या सर्वात जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर येथे आणि विमानतळ औरंगाबाद येथे असून आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.
भगवानगड हे राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम आणि राज्य महामार्ग क्र. १४८ (अहमदनगर-अमरापूर-शेवगाव-पैठण) या महामार्गांनी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे.
औरंगाबाद-पैठण मार्गे किंवा बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून येथे अनेक बस येतात. श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाणा-या भाविकांसाठी शेवगाव, गेवराई, पैठण, पाथर्डी परिवहन महामंडळ बसस्थानकमधुन बसची ये-जा चालू असते.
उत्सव
सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरु होतो.
विजयादशमी सीमोल्लंघन उत्सव
भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरु होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
भगवानबाबांची पुण्यतिथी
श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरु होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते.
शुद्ध एकादशी उत्सव
प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो.
याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. [२]
भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले.
विकास आराखडा
श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते. श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
खूप छान
ReplyDelete