In this blog we provide inforemation about bhagwan baba(श्री संत भगवान बाबा),bhagwangad (भगवानगड),vamanbhau (श्री संत वामनभाऊ).We also provide news related to bhagwangad.

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

भगवानबाबा




आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिक, पुणे) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत.

भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.

भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी स्थायिक झाले होते.

जन्म

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.

गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते' अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरुन गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.

आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव 'भगवान' ठेवले.

असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.

गुरु 

भगवानगडाच्या मान्यतेनुसार भगवानबाबाची गुरुपरंपरा पुढील प्रमाणे आहे. नारायण → ब्रह्मदेव → अत्री ऋषी → दत्तात्रेय → जनार्दनस्वामी → संत एकनाथ → गावोबा किंवा नित्यानंद → अनंत → दयानंद स्वामी पैठणकर → आनंदॠषी → नगदनारायण महाराज → महादेव महाराज (पहिले) → शेटीबाबा (दादासाहेब महाराज) → गोविंद महाराज → नरसू महाराज → महादेव महाराज (दुसरे) → माणिकबाबा → भगवानबाबा 

भगवान बाबा आणखी काही विठ्ठलभक्तांना आपले गुरू मानत. बाबांचे हे गुरू असे

भगवानबाबा यांना तुळशीमाळ घालणारे गुरू - गीतेबाबा दिघुळकर
भगवानबाबा यांना आध्यात्मिक उपदेश देणारे गुरू - माणिकबाबा
भगवानबाबांचे अध्यात्मज्ञान देणारे गुरू - बंकटस्वामी महाराज
भगवानबाबांचे पारमार्थिक गुरू - संत नामदेव
भगवानबाबांचे नाथ/पैठणकर फडाचे गुरू - संत एकनाथ
संत श्री वामनभाऊ महाराज यांना भगवानबाबा थोरले बंधू मानत.
त्यांनी पारमार्थिक गुरू संत नामदेवबाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सदगुरु मठ, मेहकरी येथे भगवानबाबा जात असत. संत नामदेवबाबांच्या वैकुंठवासानंतर त्यांच्या चाळिसाव्या हरिनाम सप्ताहाचे कीर्तन भगवानबाबांनीच केले होते. 

पालखी 


भगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तन कारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा या मार्गाने जाते.पादुकास्थान येथे आपल्या गुरुपरंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजान्च्या पालखीला आडवे जाण्याचा मान या दिंडीस आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी पंढरपूर वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय , जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’चा नामस्मरण करीत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. भगवानबाबांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. ’मी श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडाचा टाळकरी आहे’ असे ते म्हणत. नाथसंस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा भगवानगडास मान आहे.

संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.

भगवानबाबांचे उपदेश


अमोघवाणीने केलेली भगवानबाबांची कीर्तने समाजाला तळागाळातून ढवळून काढणारी आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारी ठसठशीत असत. कीर्तन म्हणजे भगवानबाबा व भगवानबाबा म्हणजे कीर्तन असे समीकरण या दशकांत रूढ झाले होते. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. अंतकरणापर्यंत पोहोचणारा कीर्तनकार असे त्यांचे वर्णन करतात. भगवानबाबा निर्मळ मनाचे, सचोटीचे, धैर्यवान, पारदर्शक, दृढनिश्चयी, दूरदृष्टी, स्पष्टवक्तेपणा, परखड वक्तृत्व, जनमनावर पकड, भागवत धर्म अस्मितेची रोकठोक विचार, विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे उत्तम वक्ते दशस्त्रेषू व्यक्तीमत्व होते. प्रेमवात्सल्यता, कोमलता, सहनशीलता, करुणा, त्यागीवृत्ती, समर्पणता, सहिष्णुता, रसाळ, निर्भयता, प्रासादिकता आदी भावना भगवानबाबांच्या कीर्तनात प्रकर्षाने दिसून येत. तत्त्वचिंतनता, सोपेपणा, तर्कशुद्धता, सदाचारी, परिपक्व, मनमोकळी, विचारी, स्पष्टवक्ती, समृद्ध शब्दरचना, नेटकी मांडणी, दिलदार शैली, विचारांची रेखीव प्रकटीकरण, वैभवशाली शब्दांची उधळण अशा भाषाशैलीत कीर्तने करत. त्यांच्या कीर्तनात भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. प्रत्येकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून लोकजागृतीचा करत. त्यांनी सर्व क्षेत्रांत कीर्तने गाजविली. जवळपास चार दशके त्यांनी कीर्तनद्वारे तमाम समाजाच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सच्चेपणामुळे त्यांच्या कीर्तनला गर्दी होत गेली. भगवानबाबांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो लोकांनी गर्दी केली होती. या सप्ताहापासूनच भगवानबाबा आणि कीर्तनासाठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये हे इथे जुळलेले गणित फ़िसकटले नाही अशी विलक्षण लोकप्रियता असलेले भगवानबाबा हे एक संस्थानच होते. आपल्या कीर्तनातून ते संत अभंगांचा मुबलक वापरही करत.

भगवानबाबा कीर्तनात नेहमी उपदेश साधे, सोपे सांगत. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, प्रीती आणि कर्तव्यकर्म यांचे पालन करा, कर्ज काढून व प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तीर्थक्षेत्रास जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचे चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, लाचार बनू नका, पशुहत्या करू नका, हिंसा करू नका, जातिभेद व अस्पृश्यता मानू नका असे रोखठोकपणे जनतेला सांगणारे समाजउद्धारक कर्मयोगी होते. त्यांनी जनसेवा हीच भगवंतची सेवा आहे म्हणून माणसाने गोरगरीबांना, दीनदलित, गरीब, दरिद्री माणसांशी माणसांसारखे वागावे तथा मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी इत्यादी गोष्टींची शिकवण दिली. हाच संदेश प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक मानवाला माणसांसारखे जगण्यास भाग पाडले. त्यांच्या विचाराने समाजात फार मोठे परिवर्तन झाले. एक नवीन पिढी अधिक त्यांनी घडविली.

संत भगवानबाबा महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात महाराष्ट्राला समता , एकता , बंधुत्वाची व प्रामुख्याने शांततेची शिकवण आपल्या वागण्यातून दिली होती .

व्यक्तिमत्त्व


भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.

भगवानबाबांवर आरोप


भगवानबाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. या कीर्तीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास झाला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या रोषालाही भगवानबाबांना बळी पडावे लागले. यातूनच त्यांच्यावर काही आरोप करण्याचाही प्रयत्न झाला.

यातील प्रमुख आरोप म्हणजे 'भगवानबाबा ब्रिटिश सरकारसाठी खबर्‍याचे काम करतात, निजामाला मदत करतात, स्वातंत्र्यलढ्यात अडचणी आणतात.' असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला. नाना पाटलांनी 'प्रति सरकार' स्थापन केलेले होते व ते शेतकरीवर्गात 'पत्री सरकार' या नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिश अधिकारी, रझाकार यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे खबरे म्हणून काम करणार्‍यांना नाना पकडत आणि त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी एका लांब कातड्याच्या खेटराने (ज्याला सुंदरी किंवा भरमाप्पा म्हटले जाई) भयंकर मार देत. त्याचबरोबर पालथे पाडून पाय घोट्याजवळ बांधून तळपायावर काठीने जबर मार देत. (शेतकरी बैलाला अशा प्रकारे बांधून त्यांच्या पायातील नख्यांना लोखंडी पत्री ठोकतात. याच प्रकाराला पत्री म्हणतात.) भगवानबाबांविषयीच्या आरोपांची माहिती मिळाल्यावर भगवानबाबांना चांगलीच शिक्षा करायची असे ठरवून क्रांतिसिंह नाना पाटील नारायणगडावर भगवानबाबांकडे गेले. त्या ठिकाणी भगवानबाबा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यात चर्चा झाली. नानांना भगवानबाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकता, करारीबाणा व सत्यवचनीपणा दिसला. भगवानबाबांविषयी आपल्याला चुकीची माहिती मिळाली हे नानांनी कबूल केले व भगवानबाबांचा निरोप घेऊन ते निघून गेले.

भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या व अशा अनेक गावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान नोंदविले होते. हा कट फसल्यानंतर विघ्नसंतोषींनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला.

समाधी


अनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना पुणे जिल्ह्यातील, रुबी हॉल क्लिनिक इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक इस्पितळातील डॉ.के.बी.ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सार्मथ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या भगवानगडावर त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणार्‍या एका विचारसूर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.

त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणले गेले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार भीमसिंह महाराज यांनी केले.

भगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून भगवानगडावर भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात भगवानगडावर कानाकोपर्‍यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यात आले. जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरश: धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच भगवानगडही हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रूंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.

श्रीक्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणार्‍या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. भगवानगडावर आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

योगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अध:पतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.

संत श्री भगवानबाबांची मंदिरे


भगवानबाबांची कीर्ती वाढत गेल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवानबाबांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. पंढरपुर, पैठण अशा बर्‍याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.

पंढरपूर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
आळंदी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील बार्शी रोड भागात "राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर सभाग्रह आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील करेवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठ्ठलगड, बीड या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत "संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील NARAYANDOH या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
इ.स. २०११ मध्ये बीड जिल्ह्यातील जोडहिंगणी येथे भाविकांसाठी भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले. 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतल्या नागझरी परिसरात २५ वर्षापूर्वी काही भक्तांनी एकत्रित येऊन भगवानबाबांचे मंदिर उभारले. 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. 
बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठान मंदिर आहे 
औरंगाबाद जिल्ह्यातील रामनगर भागात संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. 
औरंगाबाद जिल्ह्यातील ता. फुलंब्री परिसरात लिंगदरी भागात भगवानबाबा मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. 
औरंगाबाद जिल्ह्यातील सेव्हन हिल परिसरातील विद्यानगरमध्ये भगवानगड ज्ञानेश्‍वरी अध्यासन केंद्राचे उद्‌घाटन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी पाचला खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यासन, अध्यापन, प्रचार आणि प्रसार करणे हा केंद्राचा मुख्य उद्देश असून, भगवानगडाचे विशेष कार्यालयही येथून चालविण्यात येणार आहे. गडाशी जोडल्या जाणार्‍या लोकांसाठी नोव्हेंबरमध्ये वार्षिक सप्ताह व त्याच वेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पश्‍चिम महाराष्ट्रातील गोंदवले शहरालगत बोरजाईवाडी परिसरात श्री संत भगवान बाबा मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot